अरे बाप रे! उठायला उशीर झाला... जरा चडफडतच ती उठली. म्हणजे व्यायामाला सुट्टी द्यावी लगणार. पटापट आवरून नेह सारखं ती ऑफिसला गेली. कामं वाट बघत होती..
म्हणता म्हणता आठ तास निघून गेले.
खरंच असंच आयुष्य निघून चाललंय नाही का?! ह्या विचारांनी तिच्या अंगावर काटा आला. खरंय का हे...?? पूर्णपणे खरं नसलं तरी थोड खरंय.
किती गोष्टी करायच्या आहेत तिला.. आईऽऽ.. अशा हाकेने ती भानावर आली आणि परत वेळेची चक्रं चालू झाली... अगदी त्या दिवसापर्यंत. त्या दिवशी अचानक मोकळा दिवस तिच्या वाट्याला आला.
घरातले सगळे ट्रिपला गेले होते. सकाळी ऑफिसमधून फोन आला, ‘आज सुट्टी जाहीर केलीय’ आणि सगळा दिवस अंगावर आल्यासारखा वाटला... ती बावरली.. मग तिने त्यांना फोन केला, ‘कुठे पोहोचला आहात? मला सुट्टी मिळाली आहे..’ सगळे हळहळले... ‘तू एकटी आहेस..’ वगैरे म्हणाले.
एकटी!!... हेच तर हवं होतं आपल्याला. किती वर्षांत असा एकांत मिळालाच नाहीये. मग छान समाधानानं हसत ती थोड्या वेळ लोळली.. गुलजारची गाणी ऐकत असताना... मधूनच भीमसेन ऐकावे वाटले. मग निवांत खूप वेळ आंघोळ करून तिने वरण भात आणि लिंबाचं लोणचं खाल्लं.. आजीकडे नेहमी असंच खायचो ना आपण! किती वेळ तरी ती बसल्या बसल्या आजोळी जाऊन आली; पण तिची खूप लोकं कित्येक दिवस वाट पाहत होती.. पुलं, माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, अनिल अवचट.... खूप खूप होते. ती अधाशासारखं त्यांना भेटली.. दुर्गाबाईंच्या झाडांच्या आठवणी वाचताना तिला तिची झाडं आठवली. मग उठून कुंडीतल्या झाडांशी गप्पा मारल्या. त्यांना बरेच वेळा पाणी घालतानासुद्धा भेट नाही घेत आपण त्यांची...
चहा घेत झोपाळ्यावर कित्येक वेळ बसल्यावर वाटलं, रोज असंच आयुष्य गेलं तर किती मजा येईल. आराम, एकांत.. पाहिजे ते करणं?! रोज ते करणं शक्य नाही सध्या तरी, पण मनासारखं असं जगलं पाहिजे हे मात्र नक्की... तेवढ्यात फोन वाजला. ‘हां कधीपर्यंत येताय.. जेवायचं काय?... वगैरे वगैरे’
- कल्याणी भोगले